सरकारी मदतीसाठी 2 वर्षे वणवण; तरी ही प्रशासनाने फिरवली पाठ
वाघवडे गावात दरडींचा शिकार बनलेल्या स्वाती पाटील यांची यांची हृदयद्रावक कहाणी
खरा प्रज्ञावंत वृत्तसेवा/दि .१५ जुलै: गेल्या काही दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यातील वाघवडे गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून दिनकर धोंडिबा सावेकर आणि संदीप दगडू वरुटे यांच्या घराचे पस्तीस हजार रुपयांच्या जवळपास नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली . ज्या दोन घरांवर ही दरड कोसळली आहे त्याच्या वरच्या बाजूला स्वाती सात्ताप्पा पाटील यांचे घर आहे. त्यांच्या घराच्या बाजूला असलेली दरड कोसळल्याने या दोन घरांचे नुकसान झाले परंतु या दरडीच्या कोसळल्याने स्वाती पाटील यांच्या घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे आता त्यांच्या ही निवाऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
२०२२ साली दरड कोसळल्याने स्वाती पाटील यांच्या घराची पडझड झाली; त्यानंतर स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांनी त्याचा पंचनामा देखील केला परंतु सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ही त्यांना आजवर कोणताही लाभ मिळालेला नाही. शेवटी त्यांनी स्वखर्चाने आपल्या राहत्या घराची दुरुस्ती केली.त्यानंतर आज ना उद्या आपल्याला सरकारी मदत मिळेल या आशेने स्वाती पाटील यांनी गावकामगार तलाठी ते तहसीलदार या सर्वांपर्यंत धाव घेऊन आपले पाय झिजविले परंतु आजपर्यंत त्यांना ना मदत मिळाली ना पुनर्वसन झाले उलट केवळ निराशाच पदरी आली. यावर्षी गावात पुन्हा दरड कोसळल्याने वरुटे व सावेकर यांच्या घराचे नुकसान झाले परंतु स्वाती पाटील यांच्या घराला देखील याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा घराची डागडुजी करण्या इतपत त्यांच्याकडे अर्थसहाय्य नसल्याने त्या हातबल झाल्या आहेत. त्यामुळे आता तरी शासनाने माझ्याकडे लक्ष देवून माझे कुटुंबाला आर्थिक मदत करावी किंवा पुनर्वसन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सध्या आपल्या शिकत असलेल्या दोन मुलांसह स्वाती पाटील मोलमजुरी करत त्याच घरात वास्तव्यास आहेत. गेली दोन वर्षे होऊनही त्यांना सरकारी मदत मिळाली नसल्याने त्यांचे मनोबल खचले आहे.त्यामुळे आता तरी सरकारी यंत्रणा
किती तत्परतेने काम पूर्ण करेल ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.